मुंबई : चिपळूण येथील तिवरे धरण २ दिवसांपूर्वी रात्री ९ च्या सुमारास फुटलं. त्या दुर्घटनेत एका वाडीतील तब्बल २४ जण वाहून गेले. दरम्यान आतापर्यंत १८ जणांचे मृतदेह शोधपथकाच्या हाती लागले असून नशिबाने एकजण जिवंत आढळला आहे. मात्र अनेकांचा अजून थांगपत्ता लागलेला नाही. धरण फुटल्यामुळे एकूण १३ घरं वाहून गेल्यानं अनेक कुटुंबाची मोठी आर्थिक हानी देखील झाली आहे. धरण दुरुस्तीचा प्रस्ताव केवळ लालफितीत अडकला नसता, तर हा अनुचित प्रकार टाळता आला असता. तसेच, धरणाला पडलेल्या भगदाडीच्या तक्रारीची दखल प्रशासनाने घेतली असती, तर आज १८ गावकऱ्यांचा जीव वाचला असता.

दरम्यान या घटनेत एक मन हेलावून टाकणारी गोष्ट घडली आहे. तीवरे धरणामध्ये दीड वर्षाच्या चिमुरडीचा आणि तिचा आईचा देखील सरकारच्या गलथान कारभारामुळे नाहक बळी गेला आहे. घटना घडून देखील चव्हाण परिवारातील एका गोंडस दीड वर्षाच्या चिमुकलीचा आणि तिच्या आईचा शोध लागला नव्हता. अखेर दोन दिवसानंतर जेव्हा त्यांचे शव सापडले तेव्हा ते पाहून पूर्ण काळीज हलवून टाकणारं दृश्य सर्वांच्या नजरेस पडलं. आईची माया काय असते हे काल तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाने अनुभवलं, कारण त्या आईने स्वतःचा जीव सोडताना सुद्धा तिच्या त्या गोंडस आणि निरागस चिमुकलीला आपल्या उराशी घट्ट धरून ठेवलं होतं.

त्या मातीच्या गाळातून काल जेव्हा त्या चिमुकलीला आणि तिच्या आईला बाहेर काढलं तेव्हा सगळ्यांचेच डोळे पाणवल्याचे पाहायला मिळाले. कारण त्या चिमुकलीच्या आईने तिला शेवटच्या श्वासापर्यंत तिच्या मिठीत घट्ट धरून ठेवले होते. काय चुक होती त्या निष्पाप जीवाची त्या कुटुंबाने स्वप्नात सुद्धा पाहिलं नव्हतं की असं मरण येईल, पण अशा मन हेलावून सोडणाऱ्या घटनेला जेव्हा सरकार खेकडे जवाबदार असल्याचं सांगत तेव्हा मात्र संताप अनावर होतो.

तिवरे धरणफुटी: दीड वर्षाची चिमुकली आईच्या मिठीतच मृतावस्थेत सापडली; आईचा देखील मृत्यू