मुंबई: सोमवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी राज्यपालांची भेट घेतली त्यावेळी राज्यपालांनी राष्ट्रवादी सत्तास्थापन करण्यास समर्थ आहे का हे सिद्ध करा, मंगळवारी रात्री ८.३० पर्यंत राष्ट्रवादीला मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आपले पत्ते योग्य वेळी उघडणार आहे. शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनासोबत घेऊन राष्ट्रवादी राज्यात महाशिवआघाडीचा प्रयोग यशस्वी करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. राज्यपालांनी सत्तास्थापनेचं निमंत्रण दिल्याने शरद पवार आज पत्ते उघडणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, निर्धारित वेळेत राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची आहे. राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेना व अन्य छोट्या पक्षांचे सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या. कारण शिवसेनेने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यास १६० पेक्षा अधिक संख्याबळ होऊ शकते. तसेच शिवसेनेला पाठिंबा देण्याकरिता काँग्रेसला अडचणीचे होते. पण राष्ट्रवादीला पाठिंबा देण्यात काँग्रेसला काही अडचण येणार नाही.

राज्यपालांचे पत्र प्राप्त झाले असून, आधी काँग्रेसबरोबर चर्चा केली जाईल. त्यानंतर शिवसेना व छोट्या पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करू. यानंतरच सरकार स्थापण्याचा दावा करायचा की नाही याचा निर्णय घेतला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

दुसरीकडे काँग्रेसच्या या आडमुठेपणामुळे शरद पवार अत्यंत नाराज झाले असले तरी केंद्राच्या दादागिरीसमोर न झुकण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून, राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास त्याविरोधात दौरा करणार असल्याचे राष्ट्रवादीतील सूत्रांनी सांगितले. या आंदोलनात शिवसेनेलाही सोबत घेण्याबाबत विचार सुरू असून, सोमवारी उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेतही त्यांनी या शक्यतेबाबत विचार केल्याचे पवार यांच्या निकटवर्तीयांनी बोलून दाखवले.

सत्तास्थापनेचा असा देखील गेमप्लॅन असल्याची चर्चा; राष्ट्रवादीचा पुढाकार