परळी: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आज भाजपने मराठवाड्यातील परळी मतदारसंघातून केला आहे. परळी मतदारसंघात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यामध्ये जोरदार लढत होणार आहे. त्यानिमित्त आज दसऱ्याच्या मुहूर्तावर स्वतः केंद्रीय मंत्री अमित शाह परळीत पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी दाखल झाले.

अमित शहांच्या भाषणातील मुख्य रोख हा काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या मुद्द्यावर होता. तसेच भाषणात त्यांनी मराठवाडा आणि बीडमधील महत्वाच्या विषयांना आणि सामान्य मतदाराच्या दैनंदिन आयुष्यातील मुख्य मुद्यांना पूर्णपणे बगल दिल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे भाजपने संपूर्ण मराठवाड्यात आणि बीडमध्ये सत्ताकाळात नेमका काय विकास केला यावर चकार शब्द न काढता, काश्मीर, भगवान बाबा आणि भारत माता की जय अशा घोषणा देत केवळ भावनिक वातावरण निर्मिती करण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचे स्पष्ट दिसत होते.

लोकसभा निवडणुकीच्यावेळी दुष्काळाने हैराण झालेल्या मराठवाड्याकडे याच दिल्लीश्वरांनी पूर्ण दुर्लक्ष केलं होतं. भाजपचे दिल्लीतील नेते महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक केवळ भावनिक मुद्यांवर लढवण्याचं निश्चित केल्याचे अमित शाह यांच्या भाषणात अधोरेखित झालं आहे. विशेष म्हणजे अमित शाह यांनी संपूर्ण भाषणात बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, ढासळलेली अर्थव्यवस्था आणि मराठवाड्यातील गंभीर प्रश्नांना पूर्ण बगल देत, सगळं काही छान सुरु असल्याचं दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असंच म्हणावं लागेल.

सध्या राज्यात आणि देशात बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, ढासळलेली अर्थव्यवस्था, महिलांसंबंधित गुन्ह्यातील वाढ असे एक ना अनेक गंभीर प्रश्न रुद्ररूप धारण करत असल्याने भारतीय जनता पक्षाने या विषयांना दुर्लक्ष करत, केवळ भावनिक मुद्दे पुढे रेटून निवडणूक लढण्याची रणनीती आखल्याचे सिद्ध झाले आहे आणि पुढे देखील बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, ढासळलेली अर्थव्यवस्था हे गंभीर विषय भाजप नेत्यांच्या भाषणात ऐकू येणार नाहीत हे देखील स्पष्ट झालं आहे.

महाराष्ट्र विधानसभा: अमित शहांचा अजब प्रचार; सभा बीड’मध्ये आणि तुणतुणं काश्मीरचं