मुंबई: आरेतील वृक्षतोडीविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळल्यानंतर आरेमध्ये रात्रभर झाडं कापण्यात आली. काल, शुक्रवारी संध्याकाळपर्यंत जवळपास ३५० हून अधिक झाडांवर कुऱ्हाड फिरवण्याची माहिती तेथील स्थानिकांनी दिली. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस सुरक्षाही या परिसरात उपस्थित होती. पर्यावरण प्रेमींना याची माहिती मिळताच त्यांनी आरेमध्ये धाव घेत झाडं कापण्याला तीव्र विरोध केला. आंदोलने करत झाडांची कत्तल करण्यास अटकाव केला. या सर्व परिस्थितीमुले रात्रभर आरेत तणावाचे वातावरण होते. येथे उपस्थित पोलिसांनी काही आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

मुंबई उच्च न्यायालयाने गोरेगाव येथील आरे मेट्रो कारशेडविरोधात दाखल याचिका शुक्रवारी फेटाळल्या. त्यानंतर रात्री मेट्रो कारशेडसाठी येथे वृक्षतोडीला सुरुवात करण्यात आली. याची माहिती मिळताच पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला. वृक्षतोडीला विरोध दर्शवत येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी करत निषेध केली. रात्री उशिरापर्यंत वृक्षतोडीच्या विरोधासाठी पर्यावरणप्रेमींची गर्दी वाढतच गेली. अखेर पोलिसांनी यातील काही पर्यावरणप्रेमींना ताब्यात घेतले. दरम्यान, येथे दोनशेहून अधिक झाडे तोडण्यात आल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.

आरेत वृक्षतोड होत असल्याचे समजताच भांडुप, पवई, अंधेरी, गोरेगाव येथील पर्यावरणप्रेमींसह सामाजिक संस्था, विविध ग्रुप, स्थानिकांनी येथे गर्दी केली. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस दाखल झाले. येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू होते. वृक्ष तोडीस विरोध करण्यासाठी दाखल पर्यावरण प्रेमीना प्रकल्प स्थळी जाण्यास पोलीस प्रशासनाने मज्जाव केला. येथील गर्दी पांगविण्याचा प्रयत्न केला जात असतानाच पर्यावरणप्रेमी आणि पोलीसांमध्ये धक्काबुकी झाली. यावेळी पर्यावरण प्रेमींनी महापालिका, मेट्रो प्रशासन यांच्या विरोधात घोषणा दिल्या असून, तीनशे झाडे तोडल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. महत्त्वाचे म्हणजे न्याय मिळत नाही तोवर घटनास्थळाहून बाहेर पडणार नाही, असा निर्धार पर्यावरण प्रेमींनी यावेळी केला.

याबाबतचा अहवाल लक्षात घेता कारशेडच्या मार्गात येणाऱ्या झाडांचे पुनरेपण करायचे की ती तोडायची याबाबत प्राधिकरणातील सदस्यांमध्ये मतभिन्नता असल्याचे दिसत नाही. किंबहुना पुनरेपण केलेली झाडे जिवंत राहण्याची शक्यता फारच धूसर होती. त्यामुळे झाडांच्या पुनरेपणावर पैसा खर्च करूनही ती मरणारच आहेत, तर ती तोडावीत हे तज्ज्ञांचे म्हणणे योग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले.

’कारशेडसाठी झाडे हटवण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर पर्यावरणवादींमध्ये निराशेचे वातावरण पसरले. ’वृक्ष प्राधिकरणाने झाडे हटविण्यास परवानगी दिल्यापासून गेले महिनाभर पर्यावरणप्रेमी अनेक ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून यास विरोध करत होते. ’त्या पाश्र्वभूमीवर आलेला हा निकाल अनेकांसाठी निराशाजनक आणि धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया दिसून आली. मात्र या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू केल्याचे याचिकाकर्ते झोरू भथेना यांनी सांगितले.

रात्रीच्या अंधारातच भाजप-शिवसेना सरकारने मुंबईच्या फुफ्फुसांवर कुऱ्हाड घातली