मुंबई: मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा करुन सरकार बनवले पाहिजे. राज्यपालांना ते १४५ आमदारांच्या पाठिंब्याची यादी देणार असतील तर ती आनंदाची बाब आहे असे राऊत म्हणाले. त्याचवेळी संजय राऊत यांनी महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असा दावा केला. सुधीर मुनगंटीवार महाराष्ट्राला लवकरच गोड बातमी मिळेल असे म्हणाले होते. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार ही ती गोड बातमी आहे असे राऊत म्हणाले.

आज दिवसभर घडलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलेली ही प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जात आहे. सकाळी सर्वात आधी अहमद पटेल यांनी घेतलेली सोनिया गांधींची भेट, त्यानंतर संजय राऊतांनी घेतलेली शरद पवारांची भेट, भारतीय जनता पक्षाला संख्याबळ असेल तर सत्तास्थापनेचा दावा करण्याचं केलेलं आवाहन, शरद पवारांनी शेवटच्या तासाभरात काहीतरी होईल असा दिलेला इशारा, हुसेन दलवाईंनी संजय राऊतांच्या भेटीनंतर भारतीय जनता पक्षाचं सरकार येत नाही असं केलेलं वक्तव्य या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्तास्थापनेच्या महानाट्याचा आजचा अंकही विशेष चर्चेत राहिला.

राज्यपालांना आम्हीसुद्धा भेटून आलो. राज्यपालांना रामदास आठवले, महादेव जानकर हेसुद्धा भेटून आले आहेत. राज्यपालांना विनोद तावडेसुद्धा भेटून आले आहेत. राज्यपालांना अजित पवार आणि बाळासाहेब थोरातसुद्धा भेटून आले आहेत. अशा परिस्थितीत राज्यपालांचं सर्वच मार्गदर्शन घेतात. काँग्रेसच्या आमदारांचं मी कौतुक करतो. त्यांच्या भावनांचा मी आदर करतो. शिवसेनेचं सरकार यावं, अशी काँग्रेसची इच्छा आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवल्याशिवाय उद्धव ठाकरे शांत बसणार नसल्याचंही संजय राऊत म्हणाले आहेत.

आम्हाला भारतीय जनता पक्षाकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. त्यांनाही अशा प्रस्तावाची माहिती नाही. त्यामुळे बातमी पसरविणाऱ्यांनाच या प्रस्तावाची माहिती असावी, असा चिमटाही संजय राऊतांनी काढला.

शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याची गोड बातमी मुनगंटीवार महाराष्ट्राला देतील: संजय राऊत