मुंबई : सध्याची शिवसेनेची अवस्था ही वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला फेऱ्या मारणा-या सौभाग्यवतीसारखी झाली आहे. केवळ सत्तेतला संसार टिकविण्यासाठी शिवसेना सर्व अपमान गिळत आहे. भाजपचा प्राण याच शिवसेनारूपी सावित्रीमुळे टिकून आहे. त्यामुळे शिवसेनेने आता शिवबंधनासारखे जाहीरपणे भाजपाचे मंगळसूत्र बांधावे अशी बोचरी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेना भाजपच्या युती सरकारवर केली आहे.
सध्या नागपूर येथे अधिवेशनाला सुरु झालं असून त्यासंबंधित सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा विरोधकांनी केली. त्यानंतर विरोधकांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विखे पाटलांनी शिवसेना भाजपच्या युती सरकारवर बोचरी टीका केली आहे. विरोधकांच्या या पत्रकार परिषदेला विखे पाटील यांच्यासह विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार, पीरिपाचे आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, आ. सुनील तटकरे, शेकापचे आ. जयंत पाटील, आ. शरद रणपिसे, आ. प्रकाश गजभिये आदी उपस्थित होते.
सरकार वर चौफेर टीका करताना विरोधकांनी शिवसेनेला विशेष लक्ष केल्याचे स्पष्ट दिसत होते. शेतकऱ्यांची कर्जमाफी, नाणार प्रकल्प तसेच धनगर आरक्षण, मराठा आरक्षण अशा अनेक महत्वाच्या विषयांना विरोधकांनी हात घातला आहे. त्यामुळे हे अधिवेशन गाजण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे शिवसेना आता विरोधकांच्या या बोचऱ्या टीकेला काय उत्तर देणार ते पाहावं लागेल.
