नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत मतं मिळविण्यासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या निधनाचं राजकारण करत आहेत, असा थेट आरोप वाजपेयी यांची भाची करुणा शुक्ला यांनी केल्याने खळबळ माजली आहे.

माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाला एक आठवडा पूर्ण झालेला नसताना त्यांच्याच नातेवाहिकांनी म्हणजे वाजपेयींच्या भाची करुणा शुक्ला यांनी नरेंद्र मोदी तसेच भारतीय जनता पक्षावर तिखट शब्दात आरोप केले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेऊन मतं मिळविण्यासाठी अटलबिहारी वाजपेयींच्या निधनाचं राजकारण करण्यात येत आहे असं परखड मत करुणा शुक्ला यांनी व्यक्त केलं आहे. अटलबिहारी वाजपेयींच्या निधनानंतर काही दिवसांपासून देशभर सुरु असलेल्या भाजपच्या एकूणच कृतीतून त्यांनी ही शंका व्यक्त केली आहे.

भारतीय जनता पक्ष हा स्वार्थी असून अटलबिहारी वाजपेयींच्या नावे राजकारण करत आहे. वाजपेयी जिवंत असताना त्यांच्यामुळे भाजपाला खूप फायदा झाला आणि आता मृत्यूनंतरही स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी त्यांचा वापर केला जात आहे असा थेट आरोप त्यांनी एका खासगी वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. तसेच ‘अटलबिहारी वाजपेयी यांच्या मृत्यूचं राजकारण करताना भाजपाला थोडीही शरम वाटत नाही’, असंही त्यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी वाजपेयींच्या अंत्ययात्रेत ५ किलो मीटर चालण्याऐवजी त्यांच्या आदर्शावर चालले तर देशाचं भलं होईल असा टोलाही त्यांनी लगावला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत भाजपाशासित राज्यांचे अनेक मुख्यमंत्री ५ किलो मीटर पायी चालले होते. तसेच ज्या ट्रकमधून अटलबिहारी वाजपेयी यांचं पार्थिव नेलं जात होतं, त्याच ट्रकसोबत मोदी, अमित शाह चालत होते. करुणा शुक्ला यांनी यावरुनच सर्व राजकारणावर टीका केली आहे.

‘वाजपेयींच्या नावाचा वापर मतांसाठी नाही झाला पाहिजे. लवकरच ४ राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, यामुळेच पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमन सिंह वाजपेयींच्या नावाचा वापर करत आहेत’. आणि नामकरण घाट घालत आहेत. नरेंद्र मोदींनी एम्समध्ये जाऊन वाजपेयींची भेट घेतल्यानंतर लाल किल्ल्यावरुन भाषणादरम्यान वाजपेयींच नाव घेतलं होतं आणि हे सर्व निवडणूका डोळ्यासमोर ठेवूनच केलं जात आहे’, असा थेट आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणींचा होणारा अपमान पाहून मी दु:खी आहे असं सुद्धा त्या म्हणाल्या. इतक्या वर्षात त्यांना कधीही वाजपेयींची आठवण झाली नाही. त्यांना भारतरत्न मिळाला होता. आधीही त्यांच्या नावे अनेक योजना होत्या आणि हे सर्व राजकीय खेळ सुरु असल्याने मला प्रचंड दुःख होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

karuna shukla alleged PM narendra modi and bjp politicising over atal bihari vajpayee death