मुंबई : राज्यातील बळीराजाची घोर फसवणूक करून त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महाराष्ट्रातील युती सरकारला दमडीची सुद्धा ओवाळणी देऊ नये असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिवाळीतले त्यांचे ५वे व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. विशेष म्हणजे या व्यंगचित्रात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांना साडी नेसलेल्या स्वरूपात दाखविले आहे.
व्यंगचित्रात साडी नेसून हे दोघे सुद्धा शेतकऱ्याला ओवाळायला आले आहेत. आणि पाठीमागून त्या शेतकऱ्याची बायको शेतकऱ्याला खडसावून सांगते आहे की , “आत्ताच सांगून ठेवते, एक दमडी जरी टाकलीत ओवाळणी म्हणून, तर याद राखा!”, असे या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे.
राज्यातील बळीराजाला योग्य हमीभाव देऊ, कर्जमाफी देऊ, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू असे मोठमोठी आश्वासन देत हे युती सरकार सत्तेवर आले. मात्र या भाजप – शिवसेनेच्या सरकारने वेळोवेळी संकटातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, युती सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्याही मोठ्या वाढल्या आहेत. त्यामुळे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हे युती सरकार पाडव्याच्या दिवशी तुम्हाला पुन्हा ओवाळेल आणि तुमच्याकडे पुन्हा मतांची ओवाळणी मागेल. परंतु, त्यांना एक दमडीही देऊ नका, असे राज ठाकरेंना या व्यंगचित्रातून सूचित केले आहे.
परंतु, व्यंगचित्रात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांना साडी परिधान केलेलं दाखविल्याने दोन्ही बाजूने राज ठाकरे यांच्यावर काय आगपाखड केली जाते ते पाहावे लागणार आहे.
काय व्यंगचित्र आहे ते नेमकं?
