नागपूर : सध्या नागपूर पावसाळी अधिवेशनात नाणार रिफायनरीचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. संपूर्ण सभागृहाच या मुद्यावरून पेटलं असताना सत्ताधारी शिवसेनेच्या अडचणी मात्र दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. काल नाणार आंदोलकांशी शिवसेनेच्या आमदारांशी बाचाबाची झाली होते. त्यावरून कोकणवासीयांमध्ये शिवसेने’प्रती वाढत असलेली नाराजी समोर येत आहे.
परंतु आज राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी नाणारप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना प्रेझेंटेशन केले असेल असा प्रश्न उपस्थित केला. जयंत पाटलांच्या या प्रश्नाला शिवसेनेचे आमदार सुनील प्रभूंनी आक्षेप नोंदवला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी उद्धव ठाकरेंचे नाव मागे घेतले, तसेच हा उल्लेख पटलावरुन काढून टाकण्यात आला.
परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केलं की, ‘उद्धव ठाकरेंना प्रेझेंटेशन केलेले नाही, परंतु राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना मात्र प्रेझेटेंशन दिले होते आणि पुर्वी ठीक चालले होते, त्यामुळे नाणार’च्या भूसंपादनाची अधिसूचना काढली होती’ असा स्पष्ट केलं. दरम्यान, या प्रकल्पाचे प्रझेंटेशन जयंत पाटलांना नक्की दाखवू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
त्यामुळे शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना नाणारप्रश्नी प्रझेंटेशन दाखविले होते आणि त्यानंतर नाणार’च्या भूसंपादनाची अधिसूचना काढली होती आणि प्रकल्पाला विरोध वाढू लागताच शिवसेनेने भूमिका बदलली असावी असं मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून स्पष्ट होत आहे.
