मुंबई : आज मुंबईच्या ‘मातोश्री’वर जाहीर पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेने भारतीय जनता पक्षाचे पालघरचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना शिवसेनेत प्रवेश दिला. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गावित हे पालघरचे शिवसेनेचे लोकसभा उमेदवार असतील, असे जाहीर केले. त्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, श्रीनिवास वनगांना विचारूनच गावित यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मी अजून थोडे काम करतो व नंतर उमेदवारी मागतो, असे वनगा यांनीच सांंगितल्याचे उद्धव ठाकरेंनी जाहीर केले.
जर शिवसेनेकडे उमेदवारच नव्हता मग पालघरच्या जागेसाठी हट्ट का केला होता? या पत्रकारांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘स्वतः श्रीनिवास वनगा यांनीच मला अजून थोडे काम करू द्या, मग उमेदवारी घेईन, असे सांगितले.’ गावित व वनगा दोघेही आनंदात आहेत. दोघेही पालघर जिंकण्यासाठी काम करतील.
भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामण वणगा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप आणि सेनेने परस्परांना आव्हान दिले होते. त्यावेळी श्रीनिवास वनगा यांनी भगवा हाती घेत शिवसेनेतर्फे लोकसभा निवडणूक लढविली होती. मात्र काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेल्या राजेंद्र गवितांनी त्यांचा पराभव केला. त्यावेळी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत श्रीनिवास वनगा हेच शिवसेनेचे उमेदवार असतील, असे उद्धव ठाकरे यांनी घोषित केले होते. मात्र आता गावितांनाच भाजपामधून आणून शिवसेनेने त्यांना उमेदवारी देऊन श्रीनिवास वनगा यांची फसवणूक केली. आता श्रीनिवास वनगा यांना कुठल्याही परिस्थितीत विधानसभेत आमदार बनविले जाईल, असे ठाण्याचे पालकमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
