मुंबई : महाराष्ट्रात असलेली एकूणच राजकीय परिस्थिती संप आणि आंदोलन तसेच जनतेतील असंतोष पाहता महाराष्ट्रातील महानगरपालिका,पंचायत, नगरपालिका अशा सगळ्या निवडणुका भाजप जिंकतंच कसं आणि मुख्यमंत्री लोकप्रिय असल्याचा दावा आपण करतातच कसा असा खडा सवाल शिवसेनेने सामना या मुखपत्रातून केला आहे.
आजच्या ‘राजा लोकप्रिय,प्रजा संपावर’ या सामनातील अग्रलेखात फडणवीस सरकार आणि भाजपवर शिवसेनेने सडकून टीका केली आहे. तसेच त्यांच्या विजयरथावर सुद्धा प्रश्न चिन्ह उपस्थित केलं आहे. सामनातील अग्रलेखात म्हटलं आहे की, सामनातील ‘राजा लोकप्रिय,प्रजा संपावर’ या अग्रलेखात फडणवीस सरकारवर शिवसेनेने कडवी टीका केली आहे. सध्या राज्यात एकामागोमाग एक संप होत आहेत. कर्जमाफी, हमीभावासाठी शेतकरी संपावर जातात, तर ७ वा वेतन आयोग लवकरात लवकर लागू व्हावा म्हणून १७ लाख सरकारी कर्मचारी संपावर जातात. तर दारिद्याने पिचलेला आणि बेरोजगारीने ग्रासलेला मराठा समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे. इतका प्रचंड असंतोष लोकांच्या मनात असतानाही आणि समाजातले वेगवेगळे घटक आंदोलन आणि संप करत असतानाही भाजप एकामागोमाग एक निवडणुका जिंकतंय याचं आश्चर्य शिवसेनेने व्यक्त केलं आहे.
त्यातच मुख्यमंत्री फडणवीस एकीकडे लोकप्रिय असण्याचा दावा करतात तर दुसरीकडे त्यांना सत्तेवर आणणारे उद्रेक करतात मग हेच सरकारच्या लोकप्रियतेचे लक्षण का? सरकार खरंच लोकप्रिय आहे का असा सवालही शिवसेनेने या अग्रलेखातून विचारला आहे. पुढे शिवसेनेने भाजपच्या जाहिरातबाजीवर टीका करताना म्हटलं आहे की, ‘भाजपकडे जाहिरातबाजीसाठी वापरायला अवैध पांढरा पैसा सरकारकडे आहे, परंतु सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याची वेळ येते तेव्हा सरकारी तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगण्यात येते असं म्हणत राज्य सरकारच्या नैतिकतेवर शिवसेनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तसंच निवडणुकीआधी तोंडफाटेपर्यंत आश्वासनं द्यायची आणि निवडणुकीनंतर त्यापासून पळ काढायचा असं म्हणत शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला.
वाचा आजचा अग्रलेख : राजा लोकप्रिय; प्रजा संपावर
निवडणुकीआधी तोंड फाटेपर्यंत आश्वासने द्यायची व सत्तेवर येताच त्यापासून पळ काढायचा. हे शेतकऱ्यांच्या बाबतीत झाले, तसे सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीतदेखील झाले. https://t.co/Ux8k2xABzF
— Saamana (@Saamanaonline) August 10, 2018
