कल्याण : आपल्या आसपास काय चालू आहे हे पाहण्यासाठी जेंव्हा सकाळी वर्तमान पत्र उघडतो तेंव्हा चोऱ्या, खून आणि बलात्कार अशा बातम्या वाचायला मिळतात. रोजच्या जगण्यात सुद्धा माणूस शुल्लक कारणावरून हाणामारी करत आपला राग व्यक्त करतो. माणसाच्या या वागण्याला आपण पशुची उपमा दिली जाते. परंतु वस्तुतः त्यांना पशुची उपमासुद्धा देणं योग्य होणार नाही अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आमटे यांनी व्यक्त केली आहे.
परंतु मनुष्य प्राण्याचं कर्म पाहता खरंतर वन्यप्राणी खूप चांगले आहेत असं सुद्धा प्रकाश आमटे म्हणाले. मी ग्रामीण आदिवासी भागात काम करीत असताना अनाथ असलेले वाघ, आसवल, तरस, सिंह आणि विषारी साप सुद्धा माझ्याकडे आहेत. परंतु मला त्यांनी कधीही इजा किंव्हा हानी पोहोचविली नाही. आपणच त्यांच्या हक्काच्या जंगलांचा ताबा घेतल्यामुळे ते आपल्या वस्तीत प्रवेश करतात.
मनुष्यप्राणी सिव्हीलाईज झाला असं बोलण्यापेक्षा पशु प्राणी सिव्हीलाईज चांगल्या प्रकारे झाला आहे असं बोलण्याची वेळ आली आहे असं सुद्धा नमूद केलं. त्यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंदाकिनी आमटे ह्या हृदयस्पर्शी विचार मांडताना म्हणाल्या की, आज महिलांवर अत्याचार बलात्कार केले जात आहेत. सुशिक्षित समाजात लहान मुलींची भ्रूणहत्या होत आहेत. तर दुसरीकडे असे प्रकार आदिवासी समाजात घडत नाही.
खेड्या पाड्यातील आदिवासी हे सुसंस्कृत नागरी जीवनापेक्षा जास्त सुसंस्कृत आहेत. त्यांच्याकडे शिक्षण नाही आणि त्यांची जीवनशैली ठरलेली असून त्यांनी ती मान्य केली आहे. स्त्री-भ्रूण आणि बलात्काराच्या घटनेपासून ते दूर आहेत. शहरातील हे दुर्दैवी प्रकार आदिवासी समाजात घडत नाहीत आणि त्याचा त्यांना अभिमान असल्याचे मंदाकिनी आपटे यांनी आवर्जून सांगितले.
