पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत स्थानिक मूळ विषयांना सर्वच पक्षाच्या नेत्यांनी तीरांजली दिली असून प्रचाराचा सर्व रोख हा वैयक्तिक टीकेवर केंद्रित झाल्याचे चित्र आहे. नालासोपारा, वसई, विरार, बोईसर ते पालघर पट्यातील लोकांच्या मूळ समस्या ह्या प्रचारातून गायब झाल्या असून एकमेकांवर चिखलफ़ेक करण्यातच सर्व पक्ष गुंतले आहेत.
दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या मृत्यू पश्चात होणारी ही पोटनिवडणूक केवळ व्यक्तिगत आरोप आणि प्रत्यारोप करण्यात खर्ची पडत आहे. दिवंगत खासदार चिंतामण वनगा हे हयात असताना सुद्धा जेवढं राजकारण झालं नसेल, त्यापेक्षा कित्येक पटीने किळसवाणं राजकारण सध्या त्यांच्या मृत्यू पश्च्यात पहायला मिळत आहे. भाजप आणि शिवसेना पक्षाचे नेते एकमेकांवर वैयक्तिक आरोप करण्यात व्यस्त आहेत. विकासाचा आणि स्थानिक मूलभूत प्रश्नांचा सर्वच नेत्यांना विसर पडल्याचे चित्र आहे.
त्यामुळे टीका करताना वाघ कुत्र्यांच्या उपमा एकमेकांना भर सभेत दिल्या जात आहेत. एकूणच अशा प्रकारच्या टीका पाहिल्यावर भविष्यात निवडून येणारा पक्ष हा विकास या मुद्यावर पालघर जिल्ह्याला काय देणार हे आत्ताच अधोरेखित होत आहे. एकूणच पालघर पोटनिवडणूक ही एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याचं माध्यम झाल्याचं चित्र आहे. सर्वच पक्षांच्या प्रचारातील मुद्यांचा कानोसा घेतल्यास भविष्यात तरी पालघर जिल्ह्यात पायाभूत सुविधा आणि मूळ समस्यांमध्ये काही बदल होईल का असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.
