कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान, तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि विद्यासागर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड केली, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केला आहे. मंगळवारी झालेल्या शाह यांच्या रोड शो दरम्यानच्या हिंसाचाराची माहिती देण्यासाठी दिल्लीत घेतलेल्या जाहीर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पराभव डोळ्यासमोर स्पष्ट दिसत असल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा जळफळाट होत असल्याची टीकाही यावेळी अमित शहा यांनी केली.

संध्याकाळी ७.३० वाजता ही हिंसाचाराची घटना घडली. त्यावेळी कॉलेज बंद झाल्याने गेटही बंद होते. हिंसाचारावेळी भाजपाचे कार्यकर्ते या गेटच्या बाहेर होते, मध्ये पोलीस होते मग तरीही हे गेट कोणी खोलले? तसेच आतमध्ये दोन खोल्यांदरम्यान असलेल्या पुतळ्याची तोडफोड कशी काय झाली? या कॉलेजवर तृणमुलचे प्रशासन आहे. त्यामुळे ही तोडफोड ममतांच्या कार्यकर्त्यांनीच केली असून त्यांचेच लोक आतून दगडफेकही करीत होते, असा दावा यावेळी शाह यांनी केला.

जर तिथे सीआरपीएफ नसती तर मला बाहेर निघताच आलं नसतं: अमित शहा