मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तोफा थंडावल्या आणि मतदान देखील पार पडलं आहे. दरम्यान, देशातील आता शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया येत्या दोन दिवसात संपेल आणि प्रतीक्षा असेल ती २३ तारखेला लागणाऱ्या लोकसभा निकालाची. मात्र लोकसभेचा निकाल लागल्यानंतर लगेचच १०-१२ दिवसांनी पावसाळा सुरु होणार आहे. साधारण ४ महिन्यांचा पावसाळ्याचा सीझन संपताच साधारणपणे ऑक्टोबरच्या आसपास राज्यातील विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत.
परिणामी पक्ष बांधणी आणि पक्ष विस्तार तसेच उमेदवारांचा शोध याच पावसाच्या काळात सर्वच पक्षांना मार्गी लावावा लागणार आहे. यामध्ये विशेष करून मुख्य शहरी भागावर अधिक भर दिला जाईल अशी शक्यता आहे. कारण सर्वच पक्षांना आणि उमेदवारांना पावसाळा संपताच फार कमी वेळ मिळणार आहे. एकूणच जर लोकसभेत भाजप मोठी भरारी घेईल अशी शक्यता नाही आणि त्यामुळे सर्वच पक्षांना या विधानसभेत समान संधी आहे.
याच कार्यकाळात आर्थिक रसद जमा करणे आणि विधानसभा मतदारसंघा निहाय आढावा बैठक आयोजित केल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभेचा निकाल जाहीर होताच काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसे सहित सर्वच पक्ष पावसाळ्यातच जोरदारपणे विधासभेच्या तयारीला लागतील अशी शक्यता आहे.
