मुंबई : सिटी को ऑप. बँकेच्या ग्राहकाला ६ महिन्यात केवळ एक हजार रुपयेच काढता येतील असे आरबीआयने सिटी को ऑप. बँकेवर निर्बंध घातले आहेत. आरबीआयच्या या निर्बंधामुळे काल रात्री उशिरा सिटी को ऑप. बँकेच्या ग्राहकांनी मुंबईस्थित गिरगाव शाखेसमोर पैसे मिळावेत म्हणून गोंधळ घालत बँकेच्या प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष व्यक्त केला.
आरबीआयने १७ एप्रिल रोजी सिटी को ऑप. बँकेच्या प्रशासनाला प्रत्यक्ष पत्र पाठवून कोणत्याही ठेवी घेण्यास आणि कर्ज देण्यास मनाई केली आहे. त्याबरोबरच आरबीआयने केलेल्या पत्रव्यवहारा प्रमाणे सिटी को ऑप. बँकेला कोणत्याही व्यवहारासाठी आधी रिझर्व बँकेची लेखी परवानगी आवश्यक असणार आहे असं स्पष्टं केलं आहे. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांसमोर एकच खळबळ उडाली आहे.
सिटी को ऑप. बँकेच्या एकूण दहा शाखा असून रिझर्व्ह बँकेकडून आधी म्हणजे डिसेंबरमध्ये एक नोटीस पाठविण्यात आली. त्यानंतरच १७ एप्रिलला आरबीआयकडून सिटी को ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व बचत आणि सेव्हिंग, चालू आणि करंट अकाऊंट आरबीआयने सील करून सिटी को ऑप. बँकेच्या व्यवहारावर निर्बंध घातले आणि हि बातमी पसरताच बँकेच्या ग्राहकांनी थेट बँकेच्या शाखेत धाव घेतली. ग्राहकांनी जेंव्हा आम्हाला आमचे पैसे परत हवे, अशी मागणी केली. त्यावर उत्तर देताना सिटी को ऑप. बँकेच्या प्रशासनाने स्पष्ट केलं की, रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधामुळे हे शक्य नसल्याचं आम्ही त्या बाबतीत काहीच करू शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ हे सिटी को ऑप. बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी आरबीआयच्या या निर्बंधांबाबत प्रतिक्रिया दिली आहे की, आरबीआयकडून सिटी को ऑपरेटिव्ह निर्बंध येण्यापूर्वी आम्ही सिटी को ऑप. बँकेचे दुसऱ्या बँकेत विलिनीकरणाचे प्रयत्न सुरु केले होते आणि काम पूर्ण झालं असून, काही दिवसात हे विलिनीकरण पूर्ण होईल, त्यामुळे बँकेच्या ग्राहकाने चिंता करु नये. तसेच कोणाचाही पैसा बुडणार नाही. प्रत्येकाचे पैसे या बँकेत सुरक्षित असून, बँकेवर ७५ वर्ष जसा विश्वास ठेवला तसाच कायम असू द्या” असं आवाहन खासदार अडसूळ यांनी केलं. परंतु ग्राहकाला ६ महिन्यात केवळ एक हजार रुपयेच काढता येतील असे आरबीआयने सिटी को ऑप. बँकेवर निर्बंध घातले आहेत त्यामुळे ग्राहक काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत.
केवळ रिजर्व्ह बँकेच्या परवानगीनेच विद्यार्थी, जेष्ठ नागरिक आणि लग्न समारंभ यासाठी लागणारी ५०,००० एवढी रक्कम बँकेकडून मिळणार आहेत त्यामुळे ग्राहकाची डोकेदुखी वाढली आहे. महाव्यवस्थापक आणि जनरल मॅनेजर रमेश शिरगावकर यांनी काही अधिकाऱ्यांना सोबत घेऊन बेमालूमपणे २०१४-१५ आणि २०१५-१६ व्यवहार केले जे आम्हाला उशिरा कळल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी स्पष्ट केलं.
