मुंबई : अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दिलेला झटका शिवसेनेच्या फार जिव्हारी लागलेला आहे. दरम्यान, नगरच्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर त्यांनी प्रथम पाठिंब्यासाठी काँग्रेस आणि एनसीपीशी चर्चा केली होती. परंतु, एनसीपीने आयत्यावेळी धोका दिल्याचा आरोप शिवसेनेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केला आहे.
त्यामुळे भारतीय जनता पक्षाला वगळून काँग्रेस आणि एनसीपीचा पाठिंबा घेत अहमदनगरची सत्ता केंद्र ताब्यात घेण्याचा डाव शिवसेनेवरच पलटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्रिशंकू स्थितीतले निकाल लागून निवडणुकीत शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. परंतु, निकालांमध्ये तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या भारतीय जनता पक्षाने कुरघोडीच्या राजकारणात आघाडी घेत एनसीपीच्या मदतीने स्वतःचे महापौर आणि उपमहापौर नगरच्या महानगरपालिकेत बसवले होते.
दरम्यान, अहमदनगरमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीवर प्रतिक्रिया देताना पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणाले की, ”अहमदनगरमध्ये शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर महापौरपदाच्या निवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी आम्ही काँग्रेस आणि एनसीपीशी चर्चा सुरु केली होती. परंतु, एनसीपीने आयत्यावेळी दगाबाजी केली. त्यामुळे एनसीपीची भारतीय जनता पक्षाविरोधाची भूमिका केवळ दुटप्पी आहे. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत”. विशेष म्हणजे रामदास कदम यांना आपण काय बोलून काय सिद्ध करत आहोत याचे भान सुद्धा उरले नव्हते. त्यामुळे आदल्यादिवशी सामनातून नगरमधील आघाडीवरून भाजप आणि राष्ट्रवादीच्या राजकीय संबंधांना अनैतिक संबंध म्हणून टीका करणारे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा रामदास कदमांमुळे तोंडघशी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
