मुंबई : यापुढे महाराष्ट्रात दूध आणि अन्नपदार्थांमध्ये भेसळ करून सामान्यांच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्यांना यापुढं जन्मठेपेची शिक्षा होणार आणि तशी अधिकृत माहिती गिरीश बापट यांनी विधानपरिषदेत दिली. त्यासाठी सरकारकडून कायदा केला जाणार असून तसं विधेयक लवकरच सभागृहात मांडलं जाईल, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी दिली.
काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी विधान परिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सदर विषयाला अनुसरून प्रश्न उपस्थित केला होता. त्याला सरकारतर्फे उत्तर देताना बापट यांनी भेसळीचा गुन्हा यापुढे अजामीनपात्र गुन्हा करण्यात येईल, असं स्पष्टीकरण दिलं. कारण यापूर्वी हा गुन्हा अदखलपात्र होता आणि त्यामुळे संबंधितांवर कारवाई करताना अडचणी येत होत्या.
याआधी या गुन्ह्यांवर केवळ ६ महिन्यांपर्यंत शिक्षेची तरतूद होती. त्यामुळं गुन्हेगारांवर या कायद्याचा अजिबात धाक नव्हता. परंतु, यापुढं हा गुन्हा दखलपात्र नसेल. त्यामुळे या संदर्भातील कायदा अजून कठोर केला जाईल आणि गुन्ह्याची तीव्रता पाहून २ महिन्यांपासून ते जास्तीत जास्त जन्मठेपेपर्यंतची शिक्षा सुनावण्यात येईल अशी तरतूद करण्यात येईल अशी माहिती बापट यांनी सभागृहाला दिली आहे.
