28 April 2024 11:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

शिवसेनेतील फूट आणि आगामी महानगरपालिका ते विधानसभा निवडणुका, मनसे नेमकी कोणत्या स्थितीत असण्याची शक्यता? - राजकीय ठोकताळा

Raj Thackeray

MNS Chief Raj Thackeray | एकनाथ शिंदेंनी ४० आमदार आणि १२ लोकसभा खासदारांना सोबत घेऊन केलेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे आणि शिवसेना संपली अशी चर्चा सुरु झाले आहेत. त्यात ‘राजकीय खड्ड्यात’ पाय अडकलेल्या उद्धव ठाकरेंविरोधात शिंदेंनंतर ठाकरे कुटुंबातील काही ‘जुने कौटुंबिक असंतुष्ट’ शाब्दिक राजकीय लाथा घालण्यासाठी सरसावल्याचं पाहायला मिळालं.

दुसरीकडे, राज्याच्या राजकारणात सध्या शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष सुरु असून खरी शिवसेना कोणती यावरुन कायदेशीर लढाई सुरु आहे. बंडखोरीच्या धक्क्यातून पक्षाला सावरण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अजूनही उद्धव ठाकरेंकडे विधानसभेतील १४ आमदार, ६ लोकसभेचे खासदार, ३ राज्यसभा खासदार तसेच विधान परिषद आमदार आणि शेकडो नगरसेवकांचे बळ आहे. तर थेट सामान्य लोकांची जोडली गेलेली गटप्रमुखांची, शाखाप्रमुखांची आणि कार्यकर्त्यांची मोठी फौज उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं गटप्रमुखांच्या जाहीर मेळाव्यात आणि दसरा मेळाव्यात स्पष्ट झालं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंसोबत आजही मोठी फौज असल्याचं सिद्ध झालं आहे. मात्र उद्धव ठाकरेंविरोधात शिंदे गट आणि ठाकरे कुटुंबीय गेले असले तरी सामान्य लोकांची सहानुभूती उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं पत्रकारांना देखील स्पष्ट पाहायला मिळतंय. विविध प्रसार माध्यमांच्या अधिकृत ऑनलाईन प्लॅफॉर्मवर घेतल्या जाणाऱ्या सर्व्हेत लाखो नेटिझन्स व्यक्त होतं असून त्यात उद्धव ठाकरेंसोबत ९० टक्क्याहून अधिक लोकं असल्याचं पुन्हा पुन्हा सिद्ध होतंय.

सेनेत फूट, राजकीय विरोधकांना संधी?
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राजकीय विरोधक अर्थातच राजकीय संधी शोधणार आणि त्यात काही चुकीचं नाही. शिंदे गट आणि भाजप अर्थातच उद्धव ठाकरेंच्या विरोधात आहे. पण यामध्ये संधी शोधण्याचा सर्वाधिक प्रयत्न जर कोण करत असेल तर तो राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष यात वाद नाही. मनसेचे प्रवक्ते आणि नेते तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शिल्लक सेना असं वारंवार डिवचू लागले आहेत. अर्थात ते त्यांचं आकडेवारील राजकीय अज्ञान म्हणावं लागेल. विधानसभेतील १४ आमदार, ६ लोकसभेचे खासदार, ३ राज्यसभा खासदार तसेच विधान परिषद आमदार आणि शेकडो नगरसेवक, गटप्रमुख, शाखाप्रमुख आणि लाखो कार्यकर्त्यांचं बळ आजही उद्धव ठाकरेंकडे असताना मनसेला ते शिल्लक सेना वाटत असतील, तर मनसेची विधिमंडळ आणि महापालिकांमधील आकडेवारी पाहता त्यांना नेमकं ‘शिल्लक’ म्हणावं की आणखी काही हा सुद्धा संशोधनाचा विषय समजावा लागेल. विधिमंडळ आणि संसदेतील टू-थर्ड शिवसेना फुटल्याने शिवसेना संपली असं समजलं तर मनसेचे लोकसभा-राज्यसभा सोडा अगदी विधिमंडळातील टू-थर्ड संख्याबळ म्हणजे नेमके किती असा प्रश्न सर्व्हेत विचारल्यास संपूर्ण महाराष्ट्र कोड्यात पडेल. कारण एका आमदाराचा टू-थर्ड नेमका मोजायचा कसा असा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडेल.

शिवसेना अधिक खचल्यावर आपण मोठे होणार या भ्रमात मनसे?
राजकरणात एखादा पक्ष संपला म्हणजे दुसरा आपणहून मोठा होतं नाही. अगदी राजकीय संधी मिळाल्यावर पक्ष वाढवायचा म्हटलं तरी लोकांशी जोडले गेलेले जमिनीवरील राज्यभरातील स्थानिक पदाधिकारी, गटप्रमुख, शाखाप्रमुख ते सामान्य कार्यकर्ते असं भक्कम पक्षसंघटना असावं लागतं. नेमकं तेच आजही मनसेकडे नाही हे वास्तव आहे. तसेच मनसेकडे आजही स्वतःच पारंपरिक मतदार नाही. अगदी मराठी मतदार सुद्धा मनसेला एकगठ्ठा किंवा मोठ्या प्रमाणात मतदान करतो असं नाही आणि ते वारंवार आकडेवारीतून सिद्ध झालं आहे. तर दुसरीकडे हिंदुत्वाची भूमिका घेतल्याने आता अमराठी म्हणजे उत्तर भारतीय, गुजराती -मारवाडी-जैन मनसेला विश्वासाने मतदान करतील या स्वप्नात मनसे कार्यकर्ते दिसतात. उलट भाजप किंवा शिंदे गटाने मनसेसोबत युती केल्यास भाजप आणि शिंदे गट सुद्धा उत्तर भारतीयांची मतं गमावून बसेल असं राजकीय विश्लेषक सांगतात. त्यामुळे हिंदुत्वाच्या भूमिकेने अमराठी मतदार तर जवळ आला नाही, पण त्यामुळे कट्टर मराठी राजकरणाकडे कानाडोळा झाल्याने उरले सुरले मराठी मतदार सुद्धा मनसेपासून दुरावल्याचं जमिनीवरील वास्तव आहे.

आज उद्धव ठाकरेंच्या बाबतीत काय वेगळं जे पूर्वी नव्हतं?
दुसरीकडे, उद्धव ठाकरे हे आधीपासूनच ‘मी मुंबईकर’ अभियानापासून ते बाळासाहेबांच्या हिंदुत्वापासून मराठी माणूस ते अमराठी मतदारांमध्ये जोडले गेले आहेत. मात्र आता त्यांनी सर्वसमावेशक हिंदुत्वाची भूमिका घेतल्याने मुंबईसह राज्यातील मुस्लिम वर्ग सुद्धा उद्धव ठाकरेंकडे आकर्षित झाला आहे. तसेच भाजप आणि शिंदेनी राजकीय दृष्ट्या उद्धव ठाकरेंना हिंदुत्वापासून वेगळं करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकर यांचे चिंरंजीव असल्याचे ठळक सत्य असल्याने ते त्यांना हिंदुत्वापासून वेगळं करू शकत नाहीत. त्यामुळे शिवसेनेतील फुटीनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मतदार हिंदू रक्षक मानतो हे मनसे कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तोंडावर पडलेले स्वप्न आहे असं म्हणावं लागेल, कारण निवडणुकीत आकडेवारी हवी असल्याचं जमिनीवरील पक्ष संघटन मजबूत असणे आणि शिवाय संबधित पक्षाकडे स्वतःचा पारंपरिक मतदार असणे गरजेचे असते, मात्र मनसेकडे आजही या दोन्ही गोष्टींचा अभाव आहे हे वास्तव आहे.

उद्धव ठाकरे, सहानुभूती, राज ठाकरे आणि खुर्ची :
शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत सहानुभूती आहे हे वास्तव आहे. त्यांची कल्पना सत्तेतील आणि विरोधातील सर्वच राजकीय पक्षांना आहे. मात्र राजकीय पक्षांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास उद्धव ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप आणि शिंदे गटाकडे आजही जमिनीवरील पक्ष संघटनेची परिस्थिती चांगली आहे. विशेष म्हणजे या सर्वच प्रमुख पक्षांकडे स्वतःचा पारंपरिक मतदार सुद्धा आहे, अगदी प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन पक्ष सुद्धा त्यात आला. पण जमिनीवरील पक्ष संघटन आणि पारंपरिक मतदार या दोन्हीमध्ये मनसे कुठेच नाही असं म्हणावं लागेल. निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी स्थानिक पदाधिकारी याच कारणांमुळे दुसऱ्या पक्षासाठी कामं करतात. राज ठाकरेंच्या सभेत देखील यावर अप्रत्यक्षरीत्या भाष्य करण्यात आलं होतं. पण २००९ ते अगदी जून २०२२ पर्यंतचा विचार केल्यास याकाळात एक गोष्ट उद्धव ठाकरेंसोबत अजिबात नव्हती आणि ती म्हणजे ‘भावनिक सहानुभूती’ जी आगामी निवडणुकीत असेल हे स्पष्ट दिसतंय. त्यामुळे, उद्धव ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप आणि शिंदे गटाच्या निवडणुकीतील मतदारांच्या ओढाताणीत मनसेची मात्र पूर्णपणे राजकीय वाताहात होईल असं राजकीय विश्लेषक अंदाज व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे जो मनसेला युतीसाठी जवळ करेल, त्याला सुद्धा अमराठी मतांचा जबर फटका बसेल असं देखील म्हटलं जातंय.

उद्धव ठाकरेंबद्दल राजकीय सहानुभूती असल्याची चुणूक मनसेच्या नैतृत्वाला देखील आहे आणि त्यामुळेच दोन दिवसांपूर्वी मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंनी कोणतीही सहानुभूती नाही असं सांगताना मी तुम्हाला पुढे घेऊन जाईन पण स्वतः खुर्चीवर बसणार असं वक्तव्य केलं. पण ते वक्तव्य वास्तवाशी धरून नसल्याचं राजकीय विश्लेषकांनी म्हटले, कारण त्या खुर्चीवर बसण्यासाठी सुद्धा विधानसभेवर किंवा विधानपरिषदेवर निवडून यावं लागतं. पक्ष प्रमुख म्हणून संविधानिक पदाच्या खुर्चीवर बसता येत नाही हे पदाधिकाऱ्यांना सांगायला ते बहुतेक विसरले असावेत.

कारण काही वर्षांपूर्वी सभा घेऊन मी निवडणुकीच्या रिंगणात उतरणारा अशी जाहीर घोषणा करून नंतर लोकं मतं देतील का या शंकेने जाहीर घोषणा गुंडाळली आणि संविधानिक खुर्चीवर बसल्याचे म्हटल्यास विधानपरिषदेवर जायला तेवढं संख्याबळ आहे कुठे हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना मनसेपेक्षा शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंमधील स्पर्धेत मोठी संधी दिसत असल्याने ते देखील आयत्यावेळी स्वतःच्या राजकीय भविष्याचा वेगळा विचार करू शकतात असं म्हटलं जातंय. मात्र निवडणुकीच्या काळात राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदे किंवा भाजप नेत्यांच्या जेवढ्या अधिक बैठका घेतील तेवढी त्यांची उरली सुरली मतं सुद्धा हातची जातील असा अंदाज व्यक्त होतोय. कारण भाजप नेत्यांसोबतच्या अशाच निवडणूकपूर्व बैठकांच्या चुका त्यांनी पूर्वी सुद्धा केल्या आहेत आणि तेच अजूनहि कायम आहे. २०१४ मध्ये मोदींना जाहीर पाठिंबा देऊनही लोकांनी मतं दिली नव्हती. आता आता महागाई आणि बेरोजगारी प्रचंड वाढलेली असताना इतर विषयांवरून मोदी-शहांच्या आभाराचे ट्विट करून लोकं मत देतील अशी अजिबात शक्यता नाही. त्यात उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय शिंदे गटाच्या विरोधात गेल्यास संपूर्ण खेळ उद्धव ठाकरेंच्या बाजूने फिरेल अशी सुद्धा शक्यता आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MNS Chief Raj Thackeray political stand after Shivsen party split check details 15 October 2022.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x